Tuesday, March 23, 2010

श्यामची आई-आनंदाचा ठेवा.

(21st February is International Mother Language Day)


श्यामची आई हे पुस्तक म्हणजे मराठी बाल-कुमार साहित्यातला अनमोल संस्कारांचा ठेवा. एक अभिजात साहित्यकृती.

२०१० हे या पुस्तकाचं अमृतमहोत्सवी वर्ष. सलग ७५ वर्ष एखादं पुस्तक जनमानसात रुजून बसणं ही काही सोपी गोष्ट नाहीं. आईचं प्रेम हे या पुस्तकाचं मध्यवर्ती सूत्र.

एका साध्या, बाळबोध, सुसंस्कृत घराण्यातल्या संस्कृतीचं आणि त्या वेळच्या समाजाचं चित्रण या पुस्तकात आलं आहे. श्यामची आई म्हणजे साने गुरुजींच्या बालपणीच्या आठवणी. तुमच्या आमच्या बालपणासारख्या त्या रम्य-सुंदर मात्र नाहीत.हे बालपण खडतर आहे, गरीबीचं आहे. पण या सगळ्याला पुरुन उरतो, तो आईनं कलेला प्रेमाचा वर्षाव, दिलेली मूल्यं आणि कोणत्याही खडतर प्रसंगातून आपलं चारित्र्य अभंग राखून बाहेर कसं पडायचं याचं मिळालेलं शिक्षण.

या कादंबरीच्या रचनेतही वेगळेप़ण आहे. श्याम आपल्या मित्रांना रोज रात्री एक याप्रमाणे ४२ रात्री आपल्या आईच्या आठवणी सांगतो. अतिशय साधी, सोपी आणि ह्रदयाला हात घालणारी भाषा हे याचं वैशिष्ट्यं.

साने गुरुजींच्याच शब्दात सांगायचं तर" ह्रदयातला सारा जिव्हाळा इथे ओतला आहे. या गोष्टी लिहिताना माझे ह्रदय अनेकदा गहिवरून आणि उचंबळून आले आहे."

स्वातंत्र्यसेनानी म्हणून १९३३ मध्ये नाशिकच्या तुरुंगात असताना पाच दिवसात साने गुरुजींनी या आठवणी लिहून काढल्या. १९३५ मध्ये पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रसिध्द झाली. या पुस्तकानं प्ऱभावित झाला नाही असा वाचक विरळा. आचार्य प्र. के. अत्रे यांनी त्यावर काढलेला चित्रपटही खूप गाजला आणि त्याला राष्ट्रपतींचं पहिलं सुवर्णकमळ मिळालं.

साने गुरुजी हे महात्मा गांधीचा प्रभाव असलेले स्वातंत्र्यसेनानी, विचारवंत होते. त्यांनी सत्याग्रहात भाग घेतला, भूमीगत राहून चळवळ चालवली. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून आमरण उपोषणाला बसले. सर्वात महत्वाचं म्हणजे भारतीय संस्कृतीचं भान असलेले ते लेखक होते.

'भारतातल्या प्रांताप्रांतात हेवेदावे असू नयेत, एकमेकांनी एकमेकांच्या भाषा शिकाव्या, चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी ते प्रयत्न करीत.

आंतर भारती हे त्यांचं स्वप्नं होतं. यासाठीच आजच्या मातृभाषादिनी त्यांची आठवण ठेवणं फार गरजेचं आहे.

मराठीवर नितांत प्रेम करून, त्यात श्यामच्या आई'सारखं जागतिक दर्जाचं साहित्य त्यांनी लिहिलं. इतर भाषांतलं साहित्य मराठीत आणलं.

त्या भाषांचा आदर केला.

आज गरज आहे ती याच विचारांची.

Source--http://blog.prathambooks.org/2010/02/blog-post_21.html


 
होमी भाभा: भविष्यवेधी मार्गदर्शक

त्यांना चव्वेचाळीस वर्षांपूर्वी, 24 जानेवारीला अपघाती मृत्यू आला!
काही व्यक्ती द्रष्टया व भविष्यवेधी असतात, परंतु त्यांना त्यांच्या दूरदृष्टीतील विश्व प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी लागणारे कोणतेही पाठबळ मिळत नाही. या उलट, सत्तापदी बसलेल्या कित्येक व्यक्तींची दृष्टी संकुचित असते. जर एखाद्या बहुगुणी व्यक्तीच्या कर्तृत्वाला योग्य पाठबळ मिळाले तर तो समाज व देश हे सुदैवी असतात असेच म्हटले पाहिजे. सधन पारशी कुटुंबात 1909 साली जन्मलेले डॉ. होमी जहांगीर भाभा हे एक असे द्रष्टे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी  पंडित जवाहरलाल नेहरूंचा विश्वास संपादन केल्याने दोन द्रष्टया व्यक्तींची परस्परपूरक शक्ती निर्माण झाली. या एका बाबीचा भारताच्या वैज्ञानिक प्रगतीमध्ये मोठा वाटा आहे!
डॉ. भाभा अभियांत्रिकीच्या अभ्यासासाठी केंब्रिज विद्यापीठात असताना, तेथील संशोधनासाठी पोषक असलेल्या वातावरणाने प्रभावित झाले. आयुष्यात आपल्याला काय बनायचे आहे याची नेमकी कल्पना, त्यांना वयाच्या विशीच्या आतच आली. त्यांनी आपल्या वडिलांना 8 ऑगस्ट 1928 रोजी लिहिलेल्या प्रसिध्द पत्रात ते म्हणतात, '' एखादा व्यवसाय करणे अथवा अभियंता म्हणून नोकरी करणे हे माझ्या स्वभावात बसत नाही, ते माझ्या वृत्तीच्या व मतांच्या थेट विरुध्द आहे. भौतिकशास्त्र हे माझे क्षेत्र आहे व त्यात  काम करण्याची माझी ज्वलंत इच्छा आहे. एखाद्या संस्थेचा प्रमुख किंवा 'यशस्वी' माणूस होण्याची माझी इच्छा नाही. ते करण्यासाठी अनेक हुशार व्यक्ती आहेत. मला भौतिकशास्त्रामध्ये काम करू देण्याची मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो.''
त्यांच्या वडिलांना हे फारसे पटले नाही. पण त्यांनी भाभांना अभियांत्रिकीत प्रथम श्रेणी मिळाल्यास पुढील दोन वर्षे गणिताच्या अभ्यासासाठी केंब्रिजमधील वास्तव्याच्या परवानगीचे वचन दिले आणि पुढे तसेच घडले. त्यानंतर, वयाच्या तिशीपर्यंत त्यांनी भौतिकशास्त्रात उच्च दर्जाचे संशोधन केले. त्या छोटया कालखंडात, त्यांनी इलेक्ट्रॉन व त्याचा प्रतिकण पॉझिट्रॉन यांच्यातील परस्पर क्रियांविषयीचे संशोधन करून इलेक्ट्रॉन्सनी केलेल्या पॉझिट्रॉनच्या स्कॅटरिंगचा सिध्दांत मांडला.तो आजही 'भाभा स्कॅटरिंग' म्हणून ओळखला जातो व भौतिकशास्त्रात, विशेषत: कण-त्वरित्रामध्ये (पार्टिकल ऍक्सिलरेटरमध्ये) त्या सिध्दांताचा दैनंदिन वापर होतो. भाभा स्कॅटरिंगच्या कॅस्केडिंग  परिणामाद्वारे त्यांनी अवकाशात होणा-या 'कॉस्मिक शॉवर'च्या घटनेचे स्पष्टीकरण दिले. डिरॅक यांच्या सापेक्षतासिध्द समीकरणांचा त्यांनी क्वांटम इलेक्ट्रॉनिक्समध्ये केलेला यशस्वी वापर त्या समीकरणांचा सर्वात महत्त्वाचा उपयोग मानला जातो. थोडया कालावधीत केलेल्या या कार्यासाठी व पुढील अणुक्षेत्रातील कामगिरीसाठी ते नोबेल पुरस्कार मिळण्यास पात्र होते, असे अनेकांना वाटते, पण तसे झाले मात्र नाही.
 
एशियाटिकमध्ये मुंबई संशोधन केंद्र

photo2मुंबईच्या सांस्कृतिक उच्चाभिरुची एक ओळख म्हणजे 'एशियाटीक सोसायटी'. 26 नोव्हेंबर 1804 म्हणजे दोनशे पाच वर्षापूर्वी त्या वेळचे मुंबई उच्च न्यायालयाचे रेकॉर्डर ( म्हणजे सर्वोच्य न्यायमूर्ती) सर जेम्स मॅकिटोश (Sir Jems Mackintosh) यांनी मुंबई परिसराचा व शहराचा सखोल अभ्यास करण्याकरिता समविचारी मंडळींना एकत्र आणले. 
पुरातन वस्तूशास्त्र, मानवशास्त्र, समाजशास्त्र यांच्या सखोल अभ्यास चितनातून मुंबईच्या आणि त्याच्या अनुषंगाने भारताच्या प्राचीन गौरवशाली संस्कृतीचा शोध हा या सा-या ज्ञानपिपास लोकांच्या अभ्यासाचा गाभा होता. मिळतील त्या कागद पत्रांची अचूकतेने छाननी, विश्वासार्ह इतिहासाच्या नोंदी आणि त्या करतां निर्दोष कार्यपद्धतीची प्रणाली निर्माण करुन 'एशियाटिक'चा सहढ पाया घालण्याचे काम या ब्रिटीश विद्वानांनी केले.
एशियाटिकमध्ये एक लाखहून अधिक एवढी प्रचंड ग्रंथसंपदा आहे. पंधरा हजारांहून अधिक दुर्मीळ ग्रंथ, पोथ्या-हस्त लिखिते या खजिन्यात आहेत. तर तीन हजार संस्कृत, प्राकृत, पर्शियन प्राचीन हस्तलिखिते ही जतन केलेली आहेत. 

Source---http://www.thinkmaharashtra.com/think1/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=39&Itemid=40
Reblog this post [with Zemanta]

Sunday, March 7, 2010

पाटसकरांचा बारगळलेला ठराव!

पाटसकरांचा बारगळलेला ठराव!

प्रिंट ई-मेल
स्वातंत्र्योत्तर दंगली, काश्मीर प्रश्न युनोमध्ये अशा सगळ्या घडामोडी घडत असताना, भाषावार प्रांतरचनेचा प्रश्न सोडवण्यापेक्षा लांबणीवर टाकण्याचा काँग्रेस नेत्यांचा विचार अधिक बळकट झाला. त्याला अनुसरुन, संघराज्याच्या जडणघडणीविषयीच्या समितीची आणि प्रांताच्या घटनेबद्दलच्या समितीची संयुक्त बैठक होऊन, त्या बैठकीत भाषिक आणि सांस्कृतिक आधारावर नवे प्रांत निर्माण करण्याच्या प्रश्नाचा विचार करण्यासाठी भारत सरकारने आयोग नेमावा अशी शिफारस करण्यात आली. त्याच सुमारास, हरिभाऊ पाटसकरांनी 'आपण पाच नवे भाषावांर प्रांत निर्माण करण्याबाबतचा ठराव घटना परिषदेत मांडणार असल्याचे' जाहीर केले, आणि ठरावाच्या मसुद्याला पूर्व प्रसिध्दी दिली.  पाटसकरांच्या ठरावावर 27 नोव्हेंबर 1947 रोजी चर्चा होईल असे सर्वांना वाटत होते.
''आज मुंबई प्रांतात गुजरातचा जो भाग आहे त्याच्या प्रांतिक असेंब्लीतील प्रतिनिधींनी तो भाग नव्या संयुक्त महाराष्ट्र प्रांतात सामील करुन घ्यावा अशी इच्छा जर व्यक्त केली तरच त्यांचा अंर्तभाव महाराष्ट्रात करुन घ्यावा ही पाटसकरांच्या ठरावातली तरतूद मंजूर होणे म्हणजे द्विभाषिक मुंबई राज्याच्या निर्मितीला पाठिंबा देण्यासारखे होते. पाटसकरांच्या ठरावातला हा मुद्दा भाषावार प्रांतरचनेच्या तत्त्वाशी मूलत: विसंगत होता व व्यावहारिक दृष्टीने महागुजरातची मागणी करणा-या गुजराती भाषिकांनाही पटण्यासारखा नव्हता.
पाटसकरांच्या ठरावातल्या वादग्रस्त भागाचा उपयोग करुन भाषावार प्रांतरचनेचे विरोधक घटनापरिषदेत गदारोळ माजवतील अशी शंका काही प्रतिनिधींनी अनौपचारिक चर्चेच्या वेळी व्यक्त केली. अखेर, 'पाटसकरांच्या मूळ ठरावातला वादग्रस्त भाग वगळण्याची उपसूचना' एन.जी.रंगा आणि भा.न.ऊर्फ बापुसाहेब गुप्ते यांनी मांडाव्यात असे ठरले. तथापि पाटसकरांचा मूळ प्रस्ताव तसेच रंगा व गुप्ते यांच्या उपसूचना परिषदेत मांडल्याच गेल्या नाहीत! त्यामुळे त्यांच्यावर चर्चा करण्याचे कारणच उरले नाही.त्या ऐवजी एन.जी.रंगा यांनी अल्प मुदतीचा प्रश्न विचारला आणि त्याला नेहरूंनी दिलेल्या तपशिलवार उत्तरावरच भाषावार प्रांतरचनेच्या पुरस्कर्त्यांना समाधान मानावे लागले. नेहरूंनी घटना परिषदेत 27 नोव्हेंबर 1947 रोजी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावरून भाषावार प्रांतरचनेचा प्रश्न केंद्र सरकारला निकडीचा वाटत नसल्याचे जाणवते तर भाषावार प्रांतरचनेची मागणी करण-यांना संकुचित प्रांतवादी ठरवण्याचा तो प्रयत्न होता. भारताची सुरक्षितता आणि स्थैर्य या गोष्टी प्राधान्याने महत्वाच्या असून, तत्कालीन बिकट परिस्थितीत भाषावार प्रांतरचनेचा प्रश्न हाताळला गेला तर आपली बहुतेक शक्ती त्यातच खर्च होईल', असे नेहरूंचे म्हणणे होते. प्रांताच्या सीमा निश्चित करण्यासाठी एक आयोग नेमून भागणार नाही तर एकापेक्षा अधिक आयोग नेमावे लागतील आणि तसे करावे लागले तर मूळ प्रश्न अधिक गुंतागुंतीचा होईल, असा बागुलबुवा नेहरूंनी निर्माण केला.
आंध्र प्रांताच्या निर्मितीची मागणी, फार अडचणी न येता मान्य करण्यासारखी असल्याचे वैयक्तिक मत नेहरूंनी व्यक्त केले. तो प्रश्नसुध्दा भारतीय राज्यघटना अंमलात आल्यावरच  सुटेल असे सांगून, तेलुगु भाषिकांना जी थोडीफार आशा दाखवली गेली होती तिची पूर्तताही लांबणीवर टाकली गेली.
महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रांतांची निर्मिती करण्यात फार अडचणी असल्याचे मत नेहरूंनी व्यक्त केले. महाराष्ट्र प्रांताच्या निर्मितीत अडचणी असल्याचे नेहरूंचे मत त्यानंतर दहा वर्षांनीही तसेच होते. कारण संयुक्त महाराष्ट्र समितीने लोकसभेवर जेव्हा मोर्चा नेला, त्यावेळी भेटायला गेलेल्या प्रतिनिधींसमोर, 'त्यात खूप अडचणी आहेत' एवढेच नेहरूंनी सांगितले. पण नेमक्या काय अडचणी आहेत याचा उच्चार त्यांनी केला नाही. अशा सर्व प्रश्नांकडे सबंध देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा त्यांनी उपदेश केला.
या उत्तराने भाषावार प्रांतरचनेची मागणी करणा-यांना नेहरूंनी 'संकुचित प्रांतवादी' ठरवले याचा राग तर आलाच पण नेहरूंचे हे उत्तर इतकी वर्षे देशहिताचा विचार करुन संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नाबाबत आस्था न दाखवणा-या महाराष्ट्रातील काँग्रेसजनांना अधिक झोंबले
.

Read more--http://www.thinkmaharashtra.in/think1/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=5&Itemid=5
Source--http://www.thinkmaharashtra.in/think1/templates/gk_corporate/images/style1/logo.png