Saturday, February 26, 2011

स्वा. सावरकरांच्या काव्याचे क्रांतीकार्य !

स्वा. सावरकरांच्या काव्याचे क्रांतीकार्य !

स्वा. सावरकरांनी खङ्गासारख्या धारदार आणि लखलखीत लेखणीrद्वारे राष्ट्राला भव्योदात्त आणि स्फूर्तीदायी साहित्य देणे  ‘मृत्युंजय स्वा. सावरकर यांची वाणी आणि लेखणी खड्गासारखीच धारदार आणि लखलखीत होती. त्यांनी जे ज्वलंत साहित्य उभ्या राष्ट्राला दिले, ते आकाराने जेवढे भव्योदात्त तेवढेच गुणवत्तेमध्येही कांतीमान, स्फूर्तीदायी अन् चिरंजिवी ठरले आहे. 



जयोऽस्तुते श्री महन्मंगले, शिवास्पदे शुभदे ।
स्वतंत्रते भगवति, त्वामहं यशोयुत्वां वंदे ।।


अर्थ : हे महान मंगलदायक, शिवाच्या चरणांजवळ रहाणार्‍या, शुभफल देणार्‍या, स्वतंत्रता देणार्‍या श्री भगवतीदेवी तुझा विजय असो ! यश देणार्‍या देवी, तुला मी वंदन करतो.

पुण्यामध्ये १९३० साली सावरकरांनी स्वतंत्रतेचे हे स्तोत्र रचले. अद्यापही या स्तोत्राची जादू अजून कायम आहे आणि यापुढेही राहील.’ (‘स्वातंत्र्यवीर’, जन्मोत्सव विशेषांक २००८, पृष्ठ २०)
स्वा. सावरकरांचे साहित्यवाङ्मय चिरकाल टिकून रहाणारे असून दीपस्तंभाप्रमाणे भावी पिढ्या आणि देश यांना प्रकाश देणार असणे
 ‘कल्पनेच्या विहारातही स्वा. सावरकरांना वास्तवाचे विस्मरण झालेले नाही. त्यांच्या प्रतिभेचा एक पंख आकाशात विहार करणार्‍या काव्यमय कल्पनाशक्तीचा होता, तर दुसरा पंख भूतलावर संचार करणार्‍या वास्तववादी चिकित्सकबुद्धीचा होता. साहित्याच्या द्वारे स्वमत प्रचार करण्याचे जे अनन्यसाधारण सामर्थ्य नि कौशल्य स्वा. सावरकरांच्या लेखणीत होते, ते इतर कोणाही भारतीय लेखकात असल्याचे आढळत नाही.
त्यांच्याप्रमाणे दुसर्‍या कोणत्याही लेखकाने महाराष्ट्रात एवढी प्रचंड खळबळ उडवून दिली नाही किंवा इतके प्रक्षुब्ध विचारमंथन घडवून आणले नाही. स्वा. सावरकरांनी अकरा हजार पृष्ठांचे साहित्य लेखन केले. वाङ्मयातले सर्व साहित्यप्रकार हाताळले. स्वा. सावरकरांचे साहित्यवाङ्मय चिरकाल टिकून रहाणारे आहे. एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे त्यांचे साहित्य भावी पिढ्या आणि देश यांना प्रकाश देत राहील. हा चिरंतन साहित्यिक भावी भारताला नवी स्फूर्ती नि नवे धैर्य अखंड पुरवत राहील, यात शंका नाही.’ - शंकर दत्तात्रय गोखले (‘स्वातंत्र्यवीर जन्मोत्सव विशेषांक २००८’, पृष्ठ क्र. २६)

हे मातृभूमी ! तुजला मन वाहियेले ।
वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले ।
तुतेची अर्पिली नवी कविता रसाला ।
लेखाप्रती विषय तूची अनन्य झाला ।। 
 - स्वातंत्र्यवीर सावरकर, १९१०

मराठीतील ‘स्वातंत्र्य-सूक्ते’ निर्माण करणारे सावरकर ! 
‘स्वा. सावरकरांचे साहित्य म्हणजे मराठी साहित्यातील ‘स्वातंत्र्य सूक्ते’ आहेत. ज्या रमणीय उषःकाली क्रांतदर्शी मंत्रद्रष्ट्या वैदिक ऋषींना वेदांतील सूक्ते सुचली, तशाच एका रमणीय पावनक्षणी सावरकरांना ही ‘स्वातंत्र्य-सूक्ते’ स्फुरली असतील. स्वा. सावरकरांचे साहित्य म्हणजे मराठी वाङ्मयातील पुरुषसूक्त आहे.’ (‘स्वातंत्र्यवीर’, जन्मोत्सव विशेषांक २००८, पृष्ठ २२)
ज्वालाग्राही कवितांच्या बळावर स्वातंत्र्यलढ्याचा अग्नीकुंड धगधगता ठेवणारे सावरकर !
‘प्रत्येक थोर व्यक्तीच्या मागे काहीतरी प्रेरणा असते. त्याशिवाय त्या व्यक्तीच्या हातून भरीव कार्य होतच नाही. ‘स्वातंत्र्यवीर’ सावरकरांच्या मागे ‘कवीवर्य सावरकर’ भक्कम उभे होते. त्यांची ज्वालाग्राही कविताच त्यांना प्रत्येक कार्यात प्रेरणा देत होती. आयुष्यभर त्यांना कवितेने खर्‍या अर्थाने आधार दिला. कवितेच्या आधारावर त्यांनी स्वातंत्र्यलढ्याचा अग्नीकुंड धगधगता ठेवला.’ (‘स्वातंत्र्यवीर’, जन्मोत्सव विशेषांक २००८, पृष्ठ २१)

साहित्याद्वारे हुतात्म्यांच्या अनेक मालिका पोसणारे सावरकर ! 
‘लेखणी’ आणि ‘वाणी’ या उभय शक्ती केवळ देशासाठी ज्याने अखंड वाहून टाकल्या होत्या, असा सावरकरांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही साहित्यिक भारतात आढळून येत नाही. त्यांचे वाङ्मय वाचकांच्या अंतःकरणात नवीन आशा फुलवणारे नि नवे धैर्य निर्माण करणारे आहे. देशभक्ताला स्फूर्ती देणारे, तत्त्वमीमांसकाला विचार करायला लावणारे आणि स्वातंत्र्य नि जनहित यांच्यासाठी शूराला धर्मयुद्धाला प्रवृत्त करणारे असे त्यांच्या वाङ्मयाचे सामर्थ्य आहे. त्यांचीच एक लेखणी अशी होती की, जिथे हुतात्म्यांची मालिकांची मालिका स्वतःच्या दुधावर पोसली होती. इतिहासातील ही अभूतपूर्व आणि अजोड घटना आहे.’ - शंकर दत्तात्रेय गोखले (‘स्वातंत्र्यवीर’, जन्मोत्सव विशेषांक २००८, पृष्ठ २६)

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचलेले गीत स्वातंत्र्यानंतर १६ वर्षांनी आकाशवाणीवरून लावणारी सावरकरद्वेष्टी काँग्रेस ! : ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘जयोऽस्तुते श्री महन्मंगले.....,’ हे अजरामर गीत आकाशवाणीवर लागायला स्वातंत्र्यानंतर १६ वर्षे जावी लागली. हे एकच गीत लिहून स्वातंत्र्यवीर सावरकर थांबले असते, तरी राष्ट्राने त्यांना डोक्यावर घेतले असते; पण गीतकाराच्या द्वेषामुळे त्या गीताचीच महती काँग्रेसने गुंडाळून ठेवली.’ - श्री. संजय दिगंबर मुळ्ये, रत्नागिरी (दैनिक सनातन प्रभात, ३०.१०.२००६)

  सांगली येथे झालेल्या ८१ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनात स्वा. सावरकरांच्या विचारधारेला नगण्य स्थान देण्यात आले. ज्या माणसांची स्वा. सावरकरांच्या पायापाशी बसण्याची पात्रता नाही, त्यांना या संमेलनात मानाचे स्थान देण्यात आले.

भाषाशुद्धी
स्वा. सावरकरांनी केलेल्या भाषाशुद्धीचे महत्त्व 
स्वा. सावरकरांनी भाषाशुद्धी केली नसती, तर एव्हाना मराठीमध्ये उर्दूमधील २० टक्के आणि इंग्रजीतील ३० टक्के शब्द प्रचलित झाले असते अन् मराठीचे मराठीपण संपले असते. मराठी भाषेचे अशुद्धीकरण सुरूच राहिले असते, तर हल्ली ज्ञानेश्वरीतील मराठी कळत नाही, तशी १०० वर्षांनी हल्लीची मराठी कळली नसती. संस्कृतची जी स्थिती स्वातंत्र्योत्तर काळात झाली, तशी स्थिती मराठीचीही झाली असती.

स्वा. सावरकरांचा भाषाशुद्धी-शब्दकोश
सावरकरांनी अनेक परकीय शब्दांना मराठी प्रतिशब्द योजले. हे शब्द शोधतांना त्यांनी मराठीचे मराठीपण आणि नित्याच्या भाषेचे सोपेपण नष्ट होणार नाही, याची दक्षता घेतली. परकीय शब्दांना सावरकरांनी स्वतः नवीन पाडलेले आणि जुनेच पण नव्याने प्रचारात आणलेले असे अनेक शब्द त्यांच्या ‘भाषाशुद्धी’ या ग्रंथाच्या शेवटी ‘भाषाशुद्धी-शब्दकोश’ या मथळ्याखाली देण्यात आले आहेत.

स्वकीय शब्द नामशेष करून विदेशी शब्द बोकाळू देणे, म्हणजे औरस मुलांची कत्तल करून मुलगा दत्तक घेणे 

आपले तदर्थक जुने उत्तम शब्द असतांनाही किंवा नवीन स्वकीय शब्द उद्भावन करणे शक्य असतांनाही त्या जुन्या शब्दांस लुप्त करून टाकणार्‍या किंवा त्या नव्यांची नाकेबंदी करणार्‍या आणि म्हणूनच अगदी अनावश्यक असणार्‍या विदेशी शब्दांस, मग ते उर्दू असोत वा इंग्लिश असोत वा इतर कोणतेही असोत, स्वभाषेत, निष्कारण वावरू देऊ नये. आपला स्वकीय शब्द नामशेष करून विदेशी बोकाळू देणे, हा काही शब्दसंपत्ती वाढवण्याचा मार्ग नव्हे आणि औरस मुलांची कत्तल करून मुलगा दत्तक घेत सुटणे, हा काही वंशविस्ताराचा मार्ग नव्हे.

Tuesday, February 1, 2011

इजिप्तमधील राजकीय अस्थिरता

गेल्या सात दिवसांपासून इजिप्तमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. या राजकीय अस्थिरतेचे नेमके कारण काय? इजिप्तची पार्श्वभूमी, पुढे काय होणार, आंतरराष्ट्रीय दबाव अशा अनेक विषयांवर प्रश्नोत्तर स्वरुपात घेतलेला हा आढावा.

इजिप्तमधील राजकीय अस्थिरता नेमकी कशामुळे आहे?
- उत्तर आफ्रिकेतील इजिप्तमध्ये अध्यक्ष होस्नी मुबारक यांनी पायउतार व्हावे, या मागणीसाठी जनतेने आंदोलन पुकारले आहे. या क्रांतीचा वणवा देशाच्या २८ पैकी ११ प्रांतांत पोचला आहे. पोलीस आणि नागरिक यांच्यातील संघर्षात ३०हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. नेत्यांच्या पोस्टरची जाळपोळ, सरकारविरोधी घोषणाबाजी, सरकारी आस्थापनांवर हल्ले, दगडफेक अशा स्वरूपाच्या कारवाया सुरूच आहेत.
http://breakingnewsdir.com/wp-content/uploads/mvbthumbs/img_154236_egypt-unrest-and-the-path-forward.jpg
देशातील दारिद्य, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार यांची पातळी वाढल्यामुळे गेली तीस वर्षे सत्ता उपभोगणारे राष्ट्राध्यक्ष मुबारक यांच्याबद्दल जनतेमध्ये तीव्र असंतोष माजला आहे. गेल्या शनिवारी सकाळी शेकडो नागरिक राजधानी कैरोच्या ताहरीर स्क्वेअर या मुख्य चौकाच्या दिशेने निघाले असता पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. ८२ वर्षीय मुबारक यांनी देशाला शांततेचे आवाहन केले. मात्र, सरकार बरखास्त करणारे मुबारक यांनी स्वत: राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मात्र, स्वत:च्या सर्व जवळच्या नातलगांची ब्रिटनला रवानगी केली आहे. नव्या सरकारची स्थापना तातडीने होण्याची शक्यता असून नव्या पंतप्रधानांचे नाव मुबारक यांच्याकडून जाहीर होईल.

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष व शांततेचे नोबेल पारितोषिक विजेते महंमद अल् बारदेई या आंदोलनात उतरले आहेत. पोलिसांनी बारदेई आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मारझोड केली, तरी राष्ट्रपतीविरोधी आंदोलन थंडावलेले नाही. बारदेई यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. इजिप्तच्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये आंदोलनाने जोर धरला असून, पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे. अश्रुधुराचा वापर केला जात आहे.

सरकारने मोबाइलवर घातलेली बंदी २४ तासांनी उठवली गेली; मात्र इंटरनेट सेवा अजूनही बंदच आहे. आंदोलनकर्त्यांनी एसएमएस; तसेच सोशल नेटवर्किंग साइटचे आंदोलनासाठी साह्य घेतले. देशातील सर्व संवेदनशील ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्करालाही पाचारण करण्यात आले आहे. लष्कराच्या तुकड्या रणगाड्यांसह सज्ज असून, इजिप्शियन म्युझियम, सेंट्रल बँक आणि कैरो युनिव्हर्सिटी आदी ठिकाणांना संरक्षण देण्यात आले आहे. इजिप्तची राष्ट्रीय विमानसेवा किमान १२ तास ठप्प होती. काही आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी कैरोला जाणाऱ्या फेऱ्याही रद्द केल्या होत्या. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनीही या घटनेविषयी चिंता व्यक्त केली असून, देशाच्या राजकीय आणि आर्थिक फेररचनेसाठी ठोस पावले उचलण्याचे आवाहन मुबारक यांना केले आहे.



इजिप्तची पार्श्वभूमी काय?
- नील नदीच्या किनाऱ्यावर वसलेले इजिप्त ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे. इजिप्त आपल्या विशाल पिरॅमिडसाठी प्रसिद्ध आहे. येथे राष्ट्रपती होस्नी मुबारक यांनी १९८१ मध्ये सत्ता काबिज केली. अरब देशांत साऊदी अरब नंतर इजिप्त ही अर्थव्यवस्था दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. इस्रायल आणि पॅलिस्टिनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी इजिप्तने महत्त्वाची भूमिका बजावली होती. संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार इजिप्तची लोकसंख्या ८.४५ कोटी आहे.
अरबी, इस्लाम आणि पेट्रोल
सुमारे दहा लाख वर्ग किलोमीटरमध्ये पसरलेल्या इजिप्त या देशाची प्रमुख भाषा अरबी आहे. देशात इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माला मानणारे बहुसंख्य नागरिक आहेत. इजिप्तमधून पेट्रोलियम पदार्थ आणि कापूस हे मुख्यत्वे निर्यात केले जाते.
मुस्लिम ब्रदरहुड ही संघटना  इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांची विरोधक संघटना आहे. इजिप्तमध्ये मुस्लिम ब्रदरहुड वर बंदी घालण्यात आली आहे.
आर्थिक उदारीकरण आणि  बेरोजगारी
होस्नी मुबारक हे एक आर्थिक उदारवादी राष्ट्रवादी नेता आहे. त्यांच्या सरकारने आर्थिक सुधारणांचे आश्वासन दिले होते. परंतु, असे असूनही इजिप्तमध्ये बेकारीचे प्रमाण सर्वाधिक आहे. तसेच लोकांचे राहणीमानाच स्तर खालचा आहे. हेच प्रमुख कारण आहे की, देशात सरकार विरोधी लाट निर्माण झाली.
इजिप्तमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीवर परिणाम होत आहे. गेल्या सहा दिवसांपासून तेलाच्या किंमतीत आंतरराष्ट्रीय बाजारात ४.३ टक्के वाढून प्रति बॅरल ८९. ३४ डॉलर झाल्या आहेत. हीच जर स्थिती कायम राहिल्यास भाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आंतरराष्ट्रीय विशेषज्ञ प्रा. ए. के. पाशा यांच्या मते, इजिप्त आणि ट्यूनिशियानंतर ही सरकारविरोधी लाट इतर अरब देशांमध्येही पसरू शकते. त्यामुळे भारतावर याचा सरळ परिणाम होईल. पश्चिम आशिया अशांतता निर्माण झाली त्याचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होतो. तेलाच्या किंमती वाढल्याने महागाईत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमी उत्पन्न गटाला मोठा फटका बसू शकतो.
इजिप्तमध्ये राजकिय परिस्थिती अस्थीर राहिल्यास त्याचा परिणाम समुद्रमार्गाने होणाऱ्या वाहतुकीवरही होण्याची शक्यता आहे. आशिया आणि युरोपमध्ये जलमार्गाने होणारा व्यापार हा इजिप्तच्या सुवेज कालव्याने जोडलेला आहे.


इजिप्तमध्ये पुढे काय होणार ?

देशात सुरू असलेल्या विरोधानंतर राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक हे आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य करणार असतील तर पुढे काय होणार हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. सरकार पडले तर त्यानंतर देशाची धुरा कोण सांभाळणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
ट्यूनिशियामध्ये झालेल्या आंदोलनानंतर या प्रश्नाचे उत्तर शोधणे खूप कठीण झाले होते. लोकांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या त्यांची पूर्तता करणे येथे कठीण होऊन बसले होते.
इजिप्तमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पक्षाचे सरकार असल्याने विरोधी पक्ष कमकुवत आहे. तसेच वैयक्ती आणि वैचारिक पातळीवर विरोधी पक्ष दुबळा आहे. इजिप्तमध्ये अशा परिस्थितीत स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका झाल्या तर मुस्लिम ब्रदरहुड या इस्लामिक पक्षाला व्यापक समर्थन मिळेल, असे राजकिय विश्लेषकांचे मत आहे.

मुस्लिम ब्रदरहुड हा आधिकृत दृष्ट्या बंदी घातलेला पक्ष आहे. परंतु त्याचे अस्तित्व आता बहुतांशी ठिकाणी जाणवते आहे. इजिप्तमध्ये ही एकमेव संघटना आहे, की ज्यात हजारोंच्या संख्येने लोक सामिल झाले आहे. २००५मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये या पक्षाला काही जागा मिळाल्या होत्या. पक्षाचे सदस्य अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते.
राष्ट्राध्यक्ष मुबारक यांच्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर हे इस्लामी क्रांति होणार असल्याचे भासवून आपल्या आंतरराष्ट्रीय सहकार्यांना घाबरवत आहेत.
मुस्लिम ब्रदरहुड या संघटनेने या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला नाही. पश्चिमात्य देशांनी इजिप्तच्या धार्मिक विश्वासांना आणि अपेक्षांचा सन्मान केला पाहीजे असे मत मुस्लिम ब्रदरहुडचे नेते अल एरियान यांनी सांगितले आहे.

अरब देशात इतरत्र अशी असंतोषाची लाट आहे का?
आखातातील तसेच आफ्रिकेतील काही मुस्लिम देशांमध्ये तरुणांनी भ्रष्ट नेत्यांना विरोध करण्यासाठी हिंसक क्रांती सुरू केली आहे. ट्युनिशिया, येमेन पाठोपाठ आता इजिप्तमध्ये देखिल अशाच प्रकारच्या घटना घडत असल्याचे वृत्त आहे. जॉर्डनमध्येही सत्ताधा-यांविरोधात जनतेत नाराजी असल्याचे चर्चा जोरात सुरू आहे.

इजिप्तमधील हिंसक आंदोलन
 उत्तर आफ्रिकेतील इजिप्तमध्ये राष्ट्रपती होस्नी मुबारक यांच्या भ्रष्ट कारभाराला जोरदार विरोध होत आहे. तरुणांनी रस्त्यावर उतरुन हिंसक पद्धतीने राष्ट्रपती आणि सरकार विरोधात आंदोलन सुरू केले आहे. पोलीस आणि नागरिक यांच्यातील संघर्षात ३० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अद्याप ठिकठिकाणी नेत्यांचे पोस्टर जाळणे, सरकार विरोधी घोषणाबाजी करणे, सरकारी आस्थपनांवर हल्ले करणे अशा स्वरुपाच्या कारवाया सुरूच आहेत.

राष्ट्रपती मुबारक यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात शांततेचे आवाहन केले आहे. सरकार बरखास्त करणा-या राष्ट्रपतींनी स्वतः राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मात्र स्वतःच्या सर्व जवळच्या नातलगांची रवानगी इंग्लडला केली आहे.

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष नोबेल विजेते मोहम्मद अल बारदेई यांनी होस्नी मुबारक यांचा विरोध करण्यासाठी आंदोलनात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी मोहम्मद अल बारदेई आणि त्यांच्या सहका-यांनी मारझोड केली तरी राष्ट्रपती विरोधी आंदोलन थंड पडलेले नाही. अखेरच्या वृत्तानुसार, इजिप्तच्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये राष्ट्रपती होस्नी मुबारक यांच्याविरुद्धच्या आंदोलनाने जोर पकडला आहे. पोलिसांनी आंदोलकांची धरकड सुरू केलीय. प्रशासनाने मोबाइल तसेच इंटरनेट सेवा बंद केली आहे. मोहम्मद अल बारदेई यांना नजरकैद करण्यात आले आहे. देशातील सर्व संवेदनशील ठिकाणी संचारबंदी लावण्यात आली आहे.

ट्युनिशियाच्या जनतेचा असंतोष
राष्ट्रपती जॉईल अल अबीदीन यांच्या भ्रष्ट कारभाराचा विरोध करण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली आहे. मागील २३ वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रपती अबीदीन यांनी चालवलेला मनमानी थांबवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची नागरिकांची तयारी झालेली आहे.

डिसेंबर महिन्यात एका बेरोजगार तरुणाने स्वतःला पेटवून घेतले होते. त्याचा चार जानेवारी रोजी मृत्यू झाला आणि अबीदीन प्रशासनाविरुद्ध नाराज झालेले नागरिक रस्त्यावर आले. परिस्थिती इतकी चिघळली की, अबीदीन यांनी देश सोडून थेट सौदी अरेबियात राजकीय आश्रय घेतला आहे. राष्ट्रपतींच्या पत्नी दिड टन सोनं घेऊन देशातून पळून गेल्याचे बोलले जात आहे. परराष्ट्रमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. पंतप्रधान मोहम्मद घानोची यांनी नव्याने सरकार स्थापन करुन तब्बल १२ नव्या कॅबिनेट मंत्र्यांची सोबत घेत देश सावरायचे प्रयत्न सुरू केले आहेत.

येमेनचे संकटः
 मागील ३२ वर्षे येमेनमध्ये अनभिषिक्त सम्राटासारखे सत्ता उपभोगत असलेल्या राष्ट्रपती अली अब्दुल्लाह सालेह यांच्या विरोधात ठिकठिकाणी दंगली सुरू आहे. विरोधी पक्षांच्या नेतृत्वाखाली अनेक ठिकाणी सरकार आणि नागरिक यांच्यातच तीव्र संघर्ष सुरू आहे. मात्र अद्याप राष्ट्रपतींनी नागरिकांची बाजू ऐकून कोणतेही परिवर्तन केलेले नाही. दहशतवादाविरुद्धच्या युद्धात अमेरिकेचा साथीदार असलेल्या येमेनमध्ये सुरक्षा पथकांच्या मदतीने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सुरू आहे.

होस्नी मुबारक यांच्यावर आंतरराष्ट्रीय दबाव आहे का?
इजिप्तमध्ये होणाऱ्या आंदोलनामुळे राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांच्यावर जगभरातून दबाव वाढत आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी या देशांनी होस्नी मुबारक यांना इजिप्तची परिस्थिती सुधारण्याची आणि हिंसक आंदोलन संपविण्याचे आवाहन केले आहे.
कोणत्याही परिस्थिती निशस्त्र लोकांवर बळाचा वापर करून नये, आंदोलनकर्त्यांना आपले म्हणणे सरकारपर्यंत पोहचविण्याची संदी मिळायला हवी, असे आवाहन ब्रिटनचे पंतप्रधान कॅमरून, जर्मनीचे चान्सलर एंजला मर्कल आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष सारकोजी यांनी केले आहे.
अमेरिकेच राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी इजिप्तमध्ये लोकशाही प्रस्थापित होत असते तर इजिप्तच्या जनतेला समर्थन देण्याची घोषणा केली आहे. 


Source---

धगधगत इजिप्त!
स्टार माझा वेब टीम