Wednesday, March 7, 2012

!!!!!!आनंदोत्सव होळीचा !!!!!

**महाराष्ट्र राज्य हे सहयाद्री, सातपुडा आणि विंध्य पर्वतराजीत असलेलं प्रगतीच्या वाटेवरील एक राज्य. याच सातपुडा पर्वताच्या द-याखो-यातील विस्तीर्ण अशा वनश्रीनं नटलेलं मेळघाटचं अरण्य. निसर्गसख्यांचं माहेर. कारण येथे आहेत साग वृक्षांची आभाळाशी स्पर्धा करणारी झाडं. त्यामध्ये आहे वाघ, बिबट,अस्वल,रानकुत्रे,सांबर इ. वन्यप्राण्यांचे आश्रयस्थानं.

**“कोरकू” ही आदिवासी जमात याच मेळघाटात आहे. ही जमात “मुंडा”किंवा “कोलारीयन” वंशाशी संबंधीत आहे. अर्थात काही ठिकाणी “कोरवा” हया नावाने ओळखल्या जाते. मध्य प्रदेशातील होशंगाबाद,निमार आणि बैतूल जिल्हयात तर अमरावती जिल्हयातील मेळघाट परिसरातील अतिदुर्गम भागात या जमातीचे वास्तव्य आहे. धार्मिक आणि मंत्रतंत्रावर विश्वास ठेवणारे हे लोक असून महादेव ही त्यांची प्रमुख देवता आहे. जंगलाचा राजा वाघालाही ते पुजनीय मानून त्याची पूजा करतात. म्हणून वाघाला ते “कुलामामा” असं म्हणतात. त्यामुळं हा आदिवासी वाघाची कधीच शिकार करत नाही.

**कोरकुंचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे. डोंगराच्या उतरंडीवर ते आपली शेती पिकवितात. निसर्गाच्या सानिध्यात असलेली आदिवासी गाव आणि सुटसुटीत मोकळया जागेत उभारलेली कुडाची साधी घरं गावरस्त्याच्या दोनी बाजूने एका रांगेने असतात. धोतर, कुर्ता आणि डोक्यावर पागोटं असा पुरुषांचा पोषाख असतो. स्त्रीया साडया परिधान करतात.

**“कोरकू” वर्षभरात विविध सण-उत्सव साजरे करत असले तरी होळी हा त्यांचा सर्वात आवडीचा आणि पारंपारिक महत्वाचा सण आहे. कामधंद्यासाठी बाहेरगावी गेलेली मंडळी या सणानिमित्त आपआपल्या गावी परत येतात. होळी सणाची तयारी कोरकु खूप दिवस अगोदर सुरु करतात. नवनी कपडे, दागदागिने खरेदी केली जातात. घराची साफसफाई करुन सडासंमार्जन करुन घरं सजविली जातात. सर्वात महत्वाची बाब म्हणजे नृत्य करण्यासाठी आवश्यक ढोल,ताशे,टिमकी, बासरी इ.साहित्य साफसुधरी केली जातात.

**होळीचा हा पाच दिवसाचा सण निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून “भिमला” नावाचा उपासना विधी साजरा केला जातो. गावातली जाणती ज्येष्ठ मंडळी जंगलात जाऊन टेंभूर्णीच्या झाडाची पूजा करतात. या झाडाची फांदी तोडून ते गावात आणतात. ज्या स्थानावर होळी रचावयाची असते तेथे ही फांदी जमिनीत गाडतात. त्यानंतर त्याभोवती होळी रचली जाते. त्यात पाच बांबू रोवून त्यांच्या टोकावर पळसाची फुलं ,केसा,डहाळया,पु-या, चपाती आदी सामग्री बांधतात. यालाच होळीचा शृंगार मानला जातो. बांबूभोवती तुराटया, पराटया आणि लाकडं व्यवस्थित रचली जातात.

**“मुठवा” हा कोरकूंच्या गावाचा देव आहे. संध्याकाळी गावातले आबालवृध्द स्त्री-पुरुष या देवाजवळ जमा होतात. परंपरागत “फगनय नृत्य” करत ते मिरवणुकीनं गाव पाटलाच्या घरी जातात. पाटलाची बायको या मिरवणुकीला गुलाल लावून ओवाळते. तेथून ही मिरवणुक वाजत गाजत मुठवा देवाजवळ येते. पाटलाची बायको देवाजी पूजा करते. वाटेवरच्या इतर देवतांची पूजा करण्यात येते. मिरवणुकीतले लोक एकमेकांना गुलाल लावत प्रेमाने भेटतात. आदिवासींचा रानमेवा म्हणून ओळखल्या जाणा-या मोहापासून काढलेलं “सिड्डू” हे मद्य प्राशन करतात. मग ही मिरवणूक होळीच्या ठिकाणी जाते. यावेळी आदिवासी स्त्री-पुरुष मिळून हातात हात घालून सामुहिक नृत्य करतात. स्त्रीया गळयात सळी,कर्णभूषणं,हातात पाटल्या,कमरीवर करगोटा आणि पायात तोडे घालून नृत्य करत असतात. गावच्या पाटलाची बायको होळीची पूजा करते आणि होळी पेटविल्या जाते. होळी पेटल्यावर बांबू जळून खाली पडणं अशुभ मानतात. म्हणूनकाही लोक बांबू आपल्या खांद्यावर झेलतात. बांबूचे पाच तुकडे करुन ते परत होळीत टाकतात.

**होळी संपूर्ण पेटल्यानंतर कोरकू मुठवा देवाजवळ एकत्र जमतात. आडवा दोर धरुन स्त्रीया पुरुषांना अडवून “फगवा” मागतात. फगवा मिळाल्याशिवाय रस्ता सोडत नाहीत. याही वेळी स्त्री-पुरुष विशिष्ट प्रकारची गीतं गात नृत्य करत असतात. याला “होरयार नृत्य” असं म्हणतात. त्यानंतर पुरुष मंडळी एका भांडयात पैसे टाकतात. यालाच “फगवा” असं म्हणतात. त्यानंतर पुरुषांना जायला रस्ता दिला जातो. गावपाटलाच्या भेटीला हे सर्व लोक जातात. भोजनानंतर मुठवा देवाजवळ रात्रभर नृत्य सुरु करतात.

**निसर्गपूजक आणि पर्यावरण रक्षक कोरकु आदिवासी, पळसाच्या झाडांच्या फुलांपासून रंगपंचमीस रंग तयार करतात. भांडयात फगवा टाकल्याशिवाय रंग लावायला परवानगी नसते. फगवा टाकल्यावरच रंग पंचमीला खरी सुरुवात होते. इथंही लोक नृत्य करतात.कोरकू आदिवासी स्वत:ला रावणवंशी मानतात. रावणाचा मुलगा “मेघनाथ” हा सर्व देवतांना जिंकणारा महापराक्रमी देव असं कोरकू मानतात आणि म्हणूनच होळीच्या दुस-या दिवशी खांबाची म्हणजेच पर्यायानं मेघनाथची पूजा ते करतात. त्याला नवसाचं कोंबडं बळी देतात. बळी देण्यापूर्वी त्या कोंबडयाचीही पूजा होते. कोंबडयावर पाणी शिंपडल्यावर ते फडफडलं की नवस कबूल केला असं म्हणतात.

**अशा त-हेनं सातपुडा पर्वतराजीच्या मेळघाटातला कोरकू आदिवासी आपल्या परंपरागत पध्दतीनं होळीचा हा सण साजरा करतात. पंचमीच्या दिवशी होलिकोत्सवाची सांगता होते. या दिवशी मद्यप्राशन करणं पवित्र समजलं जातं. शिशिर ऋतुच्या पानगळीत होळीचा अनोखा रंगोत्सव मेळघाटातील आदिवासी कोरकुंच्या आयुष्यातही आनंदाचे रंग भरत असतो ते ऋतूराज वसंतच्या स्वागतासाठी.!!!!!!

No comments:

Post a Comment