Tuesday, March 6, 2012

जे आर डी टाटा


**पहिले भारतीय वैमानिक, भारताच्या हवाई उद्योगाचे जनक, भारतातील अग्रगण्य उद्योजक, आपल्या कामगारांचे आणि कर्मचार्यांचे हित जपणारा सहृदय उद्योजक... अशा कितीतरी विशेषणांनी जहांगीर रतनजी दादाभॉई उर्फ जे आर डी टाटा यांचे वर्णन करता येईल.

**जेआरडींचा जन्म २९ जुलै १९०४ मध्ये पॅरीस (फ्रांस) येथे झाला. रतनजी दादाभॉय टाटा यांचे ते द्वितीय पुत्र. मुंबईतील कॅथेड्रल ऍण्ड जॉन केन्नॉन स्कूल येथे काही वर्ष ते शिकले, पण जेआरडींची आई फ्रेंच असल्यामुळे त्यांचे बालपण मुख्यत: फ्रांसमध्येच गेले. काही कारणाने ते मॅट्रीकच्या पुढे शिकू शकले नाहीत.

**इंग्लिश खाडी विमानाद्वारे पहिल्यांदा पार करणारे सुप्रसिद्ध फ्रेंच वैमानिक लुईस ब्लेरिअट यांच्या जीवनकार्याने जेआरडी खूप प्रभावित झाले होते. त्यामुळे त्यांनीही विमान शिकण्याचा ध्यास घेतला. सन १९२९मध्ये त्यांनी वैमानिकाचा परवाना मिळवला. वैमानिकाचा परवाना मिळवणारे ते पहिले भारतीय होत. लगेचच १९३२ साली त्यांनी `टाटा एअरलाईन्स' या पहिल्या भारतीय प्रवासी विमान वाहतूक कंपनीची स्थापना केली. पुढे १९४६ साली त्याचे नाव बदलून `एअर इंडिया' केले गेले.
वयाच्या अवघ्या ३४व्या वर्षी म्हणजे १९३८ साली ते `टाटा सन्स'चे चेअरमन झाले. त्यानंतर ते प्रदीर्घ काळ त्या पदावर विराजमान होते. त्यांनी पदभार सांभाळला तेव्हा टाटा सन्सच्या १४ कंपन्या होत्या. जेआरडींच्या काळात ९१ कंपन्यांची त्यांनी भर टाकली. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांत त्यांनी टाटा समूहाचा विस्तार केला रसायन, वाहन, चहा, माहिती, हॉटेल्स आणि तंत्रज्ञान अशी अनेक नवीन क्षेत्र त्यांनी टाटा समूहासाठी खुली केली. एक एक क्षेत्र पादाक्रांत करीत असताना त्यांनी कोठेही नीतिमत्ता सोडली नाही. सर्व व्यवहार सचोटीने आणि पारदर्शकपणे करण्याकडे त्यांचा कटाक्ष असे.
उद्योग व्यवसायाच्या व्यवस्थापनात कामगारांचे म्हणणेही ऐकले जावे, असे जेआरडींचे मत होते. जेआरडींच्या पुढाकाराने १९५६मध्ये कामगारांच्या कल्याणासाठी खास योजना राबविण्यात आली. त्यामध्ये `दिवसातून आठ तास काम', `मोफत आरोग्य सेवा', `भविष्य निर्वाह निधी' आणि `अपघात विमा योजना' अशा पायाभूत गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. पुढे ही योजना भारत सरकारने सर्व उद्योग-व्यवसायांसाठी कायद्याने बंधनकारक केली.

**एवढेच नव्हे, तर कामगार किंवा कर्मचारी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडल्यानंतर त्याची संपूर्ण जबाबदारी टाटा समूहाने स्वीकारली. त्यामुळे वाटेत जर त्याचे काही बरे-वाईट झाले, तर त्याचीही जबाबदारी कंपनीने स्वीकारायला सुरुवात केली.
जेआरडींच्या कारकिर्दीत उद्योगसमूहाच्या विस्ताराबरोबरच इतर अनेक संस्था स्थापन झाल्या. भारतात मूलभूत संशोधन व्हावे म्हणून त्यांनी १९३६ साली टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस आणि १९४५ साली टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्चची स्थापना केली. आशियातील पहिले कॅन्सर हॉस्पिटल १९४१ साली मुंबईत सुरू केले.

**जेआरडींना अनेक पारितोषिके मिळाली. भारत सरकारतर्फे त्यांना १९५७ साली `पद्मविभूषण'नी सन्मानित करण्यात आले, तर १९९२ साली त्यांना `भारतरत्न' हा सर्वोच्च भारतीय सन्मान बहाल करण्यात आला. वयाच्या ८९व्या वर्षी, २९ नोव्हेंबर १९९३ साली जिनेव्हा (स्विट्झरलंड) येथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.

No comments:

Post a Comment