Friday, January 6, 2012

खान्देश

***खान्देश विभाग हा भारताच्या मध्य भागात येतो व महाराष्ट्र्राच्या उत्तरेला हा विभाग पसरलेला आहे. या प्रदेशाला खान्देश हे नाव मोगल साम्राज्यात मिळाले असे इतिसावरून समजते. खान्देश दक्षिण पठाराच्या ईशान्येला आणि तापी नदीच्या खोर्‍यात वसलेला आहे. त्याच्या उत्तरेला सातपुडा पर्वत रांगा, पुर्वेला विदर्भ, दक्षिणेला देश विभाग आणि पश्चिमेला पश्चिमघाट व गुजरात राज्याच्या सीमा आहेत. खान्देश विभाग विशेषत: तापी नदीच्या खोर्‍यात वसलेला आहे. तापी नदी बालाघाटच्या डोंगरात उगम पावते आणि पश्चिमेकडे वाहत अरबी समुद्राला जाऊन मिळते ह्या नदीला गिरणा, बोरी, पुर्णा, पांझरा ह्या नदया येऊन मिळतात या नदयांमुळे हा प्रदेश सुपीक झालेला आहे. तसेच ह्या नदयांच्या पाण्यामुळे शेतीला पाणीपुरवठा होतो. खान्देश विभागाची बोली भाषा अहिराणी आहे तसेच येथे भिल्ली, कोकणी ह्या भाषाही बोलल्या जातात.

****खान्देश विभाग १३८८ ते १६०१ पर्यंत फारुखी राज्यकत्र्यांच्या अमलाखाली होता. १६०१ मध्ये मोगल सम्राट अकबराने हा विभाग जिंकून मोगल साम्राज्याला जोडून घेतला. १८ व्या शतकात मराठयांनी मोगलांकडून हा प्रदेश जिंकुन मराठी साम्राज्यात विलीन केला तेव्हापासून तिसरे १८१८ चे मराठा - इंग्रज युध्दापर्यंत मराठा साम्राज्यात खान्देश विभाग होता. १८१८ मध्ये तो इंग्रज साम्राज्यात विलीन झाला. १९०६ मध्ये खान्देशाचे विभाजन होऊन त्याचे दोन विभाग करण्यात आले एक पुर्व खान्देश आणि एक पश्चिम खान्देश. पुर्व खान्देशचे मुख्यालय जळगाव येथे व पश्चिम खान्देशचे मुख्यालय धुळे येथे करण्यात आले.

No comments:

Post a Comment